Friday, September 20, 2019

कार्यतत्पर मध्य रेल्वे प्रशासन!

कार्यतत्पर मध्य रेल्वे प्रशासन!


मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना आज रेल्वे प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा प्रत्यक्ष अनुभव आला.
आज दुपारची घटना. बदलापूरहून सीएसएमटीला जाणारी १२:२२ ची धीमी लोकल पकडून ऑफिसला जायला निघालो होतो. डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान काही लोकांनी एक जखमी युवक आमच्या डब्यात टाकला. त्याला कोणी मारून टाकले होते की तो लोकलमधून पडला होता की त्याला गाडीने धडक दिली होती हे समजायला काही मार्ग नव्हता. गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. प्रवाशांमध्ये खळबळ उडाली पण आता नेमके काय करायचे याबद्दल सर्वचजण अनभिज्ञ होते. माझ्यासह आणखी दोन-चार जणांनी डब्यातील साखळ्या खेचून लोकल थांबविण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तोपर्यंत गाडी दिवा स्थानकाजवळ पोहोचली आणि सिग्नल लागल्यामुळे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मच्या आधीच थांबली.
सदर तरुणाचा होणारा रक्तस्राव पाहता काळजी याची वाटत होती की लवकरात लवकर एखाद्या स्थानकावर या तरुणाला उतरवून त्याच्यावर उपचार झाले नाहीत तर त्याचा जीव जाईल. गाडी पुन्हा मध्येच थांबल्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली आणि आता याचे काही खरं नाही असे वाटून हताश होऊन पुन्हा माझ्या जागेवर बसलो, तेवढ्यात लक्षात आले की लोकलच्या डब्यांमध्ये रेल्वे सिक्युरिटी हेल्पलाईन क्रमांक लिहिलेला असतो! तात्काळ उठलो आणि तो क्रमांक मिळवून डायल केला. सुरुवातीला जरा शंकाच होती की फोन उचलला जाईल का? समोरून व्यवस्थित प्रतिसाद मिळेल का? तात्काळ काही कार्यवाही होईल का?
पण कॉल केल्यावर अगदी दोनच रिंगमध्ये फोन उचलला गेला. समोरून बोलणाऱ्या महिलेने जखमी तरुणाची, माझी, लोकलची आणि लोकलच्या लोकेशनची सविस्तर माहिती घेतली. आणि सांगितले की लगेच दिव्यात मदत मिळेल की नाही हे सांगता येणार नाही, ठाण्यापर्यंत जावे लागेल. मी तिला विनंती केली की तर ती म्हणाली की मी पूर्ण प्रयत्न करते आणि फोन ठेवला.
एव्हाना लोकल सुरू होऊन दिवा स्थानकात पोहोचतच होती. दिव्यात मदत मिळण्याची मी आशाच सोडली होती. पण आश्चर्य! गाडी दिवा स्थानकात थांबताच दोन माणसं स्ट्रेचर घेऊन धावतच आमच्या डब्याजवळ येत होते! त्यांनीदेखील क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्या तरुणाला स्ट्रेचरवर झोपवून नेलेसुद्धा...
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सरकारला, प्रशासनाला आपण सगळेच शिव्या घालत असतो. पण सरकारी नोकरी मिळवून केवळ खुर्च्या गरम न करता प्रामाणिकपणे आपलं काम करणारीही बरीच लोकं आहेत, ही जाणीव सुखावणारी असते.
मलाही ऑफिसला जायचे असल्यामुळे पुढचा फॉलोअप नाही घेऊ शकलो. त्या तरुणाला तात्काळ आवश्यक ते उपचार मिळाले असतील अशी आशा बाळगून मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो...🙏👍
#hatsoff #centralrailway

Friday, August 2, 2019

ट्रॅफिक जॅम!

काही कारणास्तव आज विनाबॅग ऑफिसला गेलो होतो, त्यामुळे छत्रीही जवळ नव्हती. जाताना पाऊस नव्हता म्हणून काही अडचण आली नाही, पण ऑफिसमधून निघण्याच्या वेळी नेमका जोरदार पाऊस सुरू झाला आणि कधी नव्हे ते मला स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा करावी लागली. पण, दुर्दैव असं की ऑफिस ते स्टेशन हे अंतर जे मी नेहमी 'चालत' दहा मिनिटांत कापतो, तेच अंतर कापायला रिक्षाला तब्बल अर्धा तास लागला...
प्रचंड ट्रॅफिकमुळे रिक्षा पुढे सरकू शकत नव्हती आणि मुसळधार पावसामुळे मी रिक्षातून उतरू शकत नव्हतो. परिणामी, पाऊस नसता तर जी ट्रेन मी चालत जाऊन पकडू शकलो असतो ती रिक्षाने जाऊन सुद्धा मला मिळाली नाही...
*निष्कर्ष : वेळ गेला, पैसा गेला, ट्रेनही गेली, राहिला केवळ मनःस्ताप, तो घेऊन घरी चाललोय...*😒

Saturday, July 27, 2019

'इन्सानियत अभी जिंदा हैं मेरे दोस्त!'

     'इन्सानियत अभी जिंदा हैं मेरे दोस्त!'

२६ जुलै २००५ हा दिवस प्रत्येक मुंबईकराला कायम लक्षात राहिल असा आहे. मुंबईसह सर्व उपनगरांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 'अतिवृष्टी' हा शब्द मी तरी तेव्हा पहिल्यांदाच ऐकला आणि अनुभवलाही. भयंकर अनुभव होता तो. मी आणि माझं कुटुंब जरी त्यावेळी सुखरूप राहिलो असलो तरी हजारो लोकांना त्यावेळी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. कित्येकांना मोठी वित्तहानी तर काहींना जीवितहानी सुद्धा सहन करावी लागली. त्यामुळे २००५ नंतर प्रत्येकच वर्षी तमाम मुंबईकरांची २६ जुलै या तारखेकडे सावध नजर असते. आणि त्यांची ही भीती थोड्याफार प्रमाणात का असेना पण खरी ठरते. दरवर्षी या तारखेला नेहमीपेक्षा थोडा जास्तच पाऊस पडतो. पण यावर्षी मात्र खऱ्या अर्थाने २००५ च्या घटनेची पुनरावृत्ती झाली असे म्हणायला वाव आहे. २२ - २३ तारखेपासूनच पावसाने जोर धरला होता. आणि बरोब्बर २६ जुलैला सकाळपासूनच त्याने त्याचे 'ते' रौद्ररूप धारण करायला सुरुवात केली.
      दुपारी ऑफिसला गेल्यापासून मी बातम्यांचे अपडेट घेत होतो. बाहेरची परिस्थिती बिघडत चालली आहे याची जाणीव होत होतीच. रात्री अकराच्या सुमारास काम आटपून ठाणे रेल्वे स्थानक गाठलं. रात्री ११:०९ ची बदलापूर फास्ट लोकल तशी वेळेवरच आली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे असं समजून निश्चिन्त झालो. दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गाडीला गर्दी सुद्धा नेहमीपेक्षा कमीच होती. त्यामुळे गाडीत चढल्याबरोबर उभं राहायला दोन सीटच्या मधली 'सेफ' जागा मिळाली.
       मी तर 'आजच्या दिवशी घरी जायला गाडी मिळाली' एवढ्यातच समाधान मानून होतो. पण थोड्याच वेळात हे समाधान चिंतेत परावर्तीत झाले. गाडीने फक्त ठाणे स्टेशन सोडलं आणि ती एकदम 'स्लो-मोशन'मध्ये गेली. रडत-खडत अर्धा तास प्रवास झाल्यानंतर गाडी दिव्याला पोहोचली. हळूहळू परिस्थिती लक्षात आली. लोकलमध्ये कोणत्या सूचना येत नव्हत्याच. मोबाईलवर येत असलेल्या अपडेट्सवरून आणि लोकांच्या कुजबुजण्यातून खात्री झाली, की कल्याणच्या पुढे गाड्या जातच नाहीत. आणि मग सगळ्यांची घालमेल सुरु झाली. आता घरी कसं पोहोचायचं? एवढ्या रात्री कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? यावर लोकांची आपापसांत चर्चा सुरु झाली. मी मात्र आपल्या स्वभावाप्रमाणे शांत उभा होतो.(याच स्वभावामुळे अनेकांना मी आकडू, खडूस, गर्विष्ठ वगैरे वाटतो.) डोंबिवलीला उतरण्यासाठी एकजण उठला, मला बसायला जागा मिळाली. मी बसलो, लोकांच्या चर्चा सुरुच होत्या. मी मोबाईलमध्ये डोकं घालून अपडेट्स बघत होतो. मी काहीच बोलत नाही हे बघून माझ्या शेजारच्या माणसाने स्वतःहून माझ्याशी बोलायला सुरुवात केली. वडिलधारा माणूस म्हणून मी सुद्धा बोलत राहिलो. त्यांना विठ्ठलवाडीला उतरायचं होतं आणि मला बदलापूरला.
       गाडीचा वेग जसजसा मंदावत चालला होता तसतशी इकडे लोकांची अस्वस्थता वाढत चालली होती. आपल्यापुढे गाड्यांची मोठी रांग लागली असणार हे सगळयांच्याच लक्षात आलं होतं. आतातर गाडी आपल्याला डोंबिवलीपर्यंत तरी पोहोचवते की नाही अशी शंका येऊ लागली. परंतु सुदैवाने कोपरनंतर गाडीने थोडा वेग घेतला. आता थोड्याच वेळात गाडी कल्याण स्थानकात पोहोचणारच होती, की तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेला माणूस उठला. रॅकवर ठेवलेली त्याची बॅग त्याने खाली घेतली आणि त्यातून बिस्किटांचा एक मोठा पुडा काढून माझ्यापुढे धरत म्हणाला, 'हे ठेवा जवळ'. मी आश्चर्याने त्या माणसाकडे बघितलं आणि 'नको' म्हणालो. तो पुन्हा म्हणाला, 'मला याची गरज नाही, मला विठ्ठलवाडीलाच जायचंय. कल्याणहून मी कसाही पोहोचेन घरी. पण तुम्हाला बदलापूरपर्यंत जाता येईल की नाही, जायला किती वाजतील याचा काही भरवसा नाही. कदाचित एखाद्या लॉजवर थांबावं लागलं तर हे (बिस्कीट) कामाला येईल. बाहेरचं काही तेलकट  खाण्यापेक्षा हे खा!' मी अनेकदा नकार दिल्यानंतरही त्या माणसाने तो बिस्कीटपुडा माझ्याकडे सोपवला आणि कल्याणला उतरून निघून गेला...
       कल्याणच्या पुढे गाडी जाणारच नव्हती, तशी उद्घोषणा प्लॅटफॉर्मवर सुरु झाली होती. मग मी पण गाडीतून उतरून ब्रिजच्या दिशेने चालत विचार करू लागलो, कोण होता हा माणूस? काय ओळख होती आपली? किती मिनिटं बोललो आम्ही एकमेकांशी? फार काही बोलणं झालंच नव्हतं आमच्यात आणि तरीसुद्धा या माणसाने माझा एवढा विचार करावा? मी ब्रिजवर पोहोचलो आणि अचानक मोबाईलला नेटवर्क मिळाल्यासारखं एकेक मित्रांचे फोन आणि मेसेजेस येऊ लागले. इतक्या रात्री म्हणजे साधारण दीडच्या सुमारास जवळ-जवळ २० - २५ मित्र-मैत्रिणींनी माझी विचारपूस केली. यातलं कोणीही मला नेहमी भेटत नाही, खरंतर आम्ही भेटतच नाही. तरीसुद्धा कोणी मला आपल्या घरी यायला सांगत होतं, कोणी बदलापूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करत होतं तर कोणी मला सोबत म्हणून माझ्याकडे यायला निघालं होतं. हे सगळेच काही मित्रही नव्हते, काही जण तर केवळ ओळखीचे होते.
मनात विचार आला, आपण आजकाल नेहमी म्हणतो, की माणसांमधली माणुसकी लोप पावत चालली आहे. पण मग इतक्या रात्री ही लोकं आपापल्या घरात सुखरूप असताना आणि बाहेर परिस्थिती एवढी वाईट असताना सुद्धा आपल्या मदतीसाठी इतकी तत्पर कशी ? अशा काही घटना घडल्या की माणसातल्या माणुसकीचं सुंदर दर्शन घडतं. शेवटी सर्वांची मदत नम्रपणे नाकारत आणि ज्ञात-अज्ञात अशा सर्व हितचिंतकांचे आभार मानत कल्याणमध्येच माझ्या एका भावाकडे मी जायला निघालो, मला न्यायला तो कल्याण स्टेशनला आला होता. पण जाता-जाता नकळतपणे स्वतःशीच पुटपुटलो, 'इन्सानियत अभी जिंदा हैं मेरे दोस्त!'